गांधारी
गांधारी महाभारतातील एक महत्त्वाचे पण दुर्लक्षित पात्र. गंधार देशाची स्वरुपसुंदर राजकन्या दुर्दैवाने एका अंध राजाची पत्नी होते व संपुर्ण जिवन डोळे असूनही निव्वळ पती निष्ठा म्हणून डोळ्यांवर पट्टी बांधून अंध स्वरुपात व्यतीत करते. डोळे असून अंध म्हणून आयुष्य व्यतीत करताना तिला ज्या वेदना सहन कराव्या लागल्या असतील त्यांची तुम्ही आम्ही फक्त कल्पना करु शकतो. एखादी अंध व्यक्तीच तिचं दु:ख तिची वेदना समजू शकते.
जेवढा म्हणून आपण गांधारीचा विचार करायला लागतो तेवढं आपण तिच्या वेदनेच्या अधिक जवळ जातो. एका देशाची राजकन्या म्हणून तिच्या काही भाव भावना असतील. तिच्याही स्वप्नातल्या राजकुमारवर तिचं मन आकृष्ट झाले असेल. तिलाही एखाद्या तेजस्वी राजाची राणी होण्याची आकांक्षा असेलच. मग तिच्या ईच्छा आकांक्षांचे काय झाले, व का असे अंधकारमय जीण तिच्या नशिबी आले. याचा कोणी विचारच करत नाही. संपूर्ण महाभारतात तिला एक महान पतीव्रता असे म्हणून बोळवण केली असेच वाटते.
महाभारत निश्र्चीतच आपले एक महाकाव्य आहे. व त्यामधून भगवान श्रीकृष्णांनी भगवतगीता रुपाने महान तत्वज्ञान मानवास दिले व जिवनाचा महामंत्र दिला आहे हे सत्य आहेच. पण मग गांधारीवर जो अन्याय झाला त्याचा आपण विचार करणार की नाही हा प्रश्र आहे. आजही समाजात अशा अनेक गांधारी आपले जीवन व्यतीत करताना दिसतात. मुळात गांधारीचा धृतराष्ट्रा बरोबर झालेला विवाह हा एक राजकारणाचा भाग होता. हस्तीनापूर सारख्या सम्राटाकडून मागणी घातली गेल्यानंतर त्यास नकार देण्याची हिम्मत गांधार राजाची नव्हती व त्याचबरोबर नाही म्हणले तरी हस्तीनापूर सारख्या मोठ्या राजघराण्याशी जुळणारे नाते आजच्या भाषेत सोयरीक यांचा मोह गांधार नरेशास झालाच नसेल असे नाही. आजही जर एखाद्या मंत्र्याने किंवा आमदारांने जर त्याच्या मुलासाठी एखाद्या वधू पित्याला मागणी घातली तर
तिला झिडकारण्याचे धाडस किती वधू पिता दाखवतील. मंत्री आमदार यांचा सध्या असलेला रुबाब व काही अंशी दरारा त्याला हे धाडस करु देणार नाहीच त्याचबरोबर अशा राजकीयदृष्ट्या फायद्याच्या सोयरीकीचा मोहही त्याला होणारच. मग अशा वेळी त्या मुलीला विचारण्याची तिचा होकार आहे का याची साधी विचारपूस सुध्दा केली जात नाही व ती मुलगी डोळे असून सुद्धा जे काही आपल्या घरच्या लोकांनी ठरवले असेल त्याच्यापुढे मान करुन वरमाला स्विकारते व गांधारी सारखं आपलं आयुष्य व्यतीत करते.
गांधारीने शंभर मुलांना जन्म दिला असं महाभारतात दिसून येते. आता मुळात कोणतीही स्त्री १०० मुलांना जन्म देणं वैज्ञानिक दृष्ट्या शक्य वाटत नाही. तरीही आपण मान्य करु की तिला जी काही दैवी शक्ती तिच्या तपश्चर्येमुळे प्राप्त झाली होती. तो एक दैवी चमत्कार होता पण आता सुध्दा काही सुशिक्षित अपवाद सोडले तर एकापाठोपाठ एक मुलांना जन्म घालणारे महाभाग आपल्याला समाजात दिसून येतात. वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुली पाठोपाठ मुली झाल्या तरी मुलगा हवा म्हणून त्या स्त्रिला बाळंतपणाच्या वेदना देणारे महाभाग अगदी सुशिक्षित समाजातही आढळून येतात. येथे त्या स्त्रिच्या अनुमतीची गरजसुध्दा भासत नाही तर तिला होणाऱ्या त्रासाची कोण चिंता करणार. यामध्ये त्या स्त्रिचा होणारा कोंडमारा कोणालाही दिसत नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही वेळा एखादी स्त्रीच सासूच्या भूमिकेतून आपल्या सुनेला मुलगा होण्यासाठी भावनिक दृष्टीने बोलून अशा वारंवार बाळंतपणाच्या फेऱ्यात अडकले व ती स्त्री मुकाट्याने ते सर्व सोसत रहाते.
गांधारीला शंभर पुत्र झाले पण ते सर्व वाममार्गी होते त्यामुळे युध्दमधे ते सर्व मारले गेले व शेवटी तीला निपुत्रीक म्हणून आपले जिवन व्यतीत करणे क्रमप्राप्त झाले. येथे पुत्रांची संख्या किती हे महत्त्वाचे नाही तर सद्वर्तनी पुत्ररत्न असणे किती महत्त्वाचे आहे हे दिसून येते. आताच्या काळात असं धर्मयुध्द होत नाही पण कौरवांच्या कुळातील दुर्जन पोटी जन्म घेतात व आपल्या वर्तनाने आपल्या मातापित्यांना मनस्तापाला कारणीभूत होतात. काही गैरमार्गाने जातात तर काही आपल्या मातापित्यांना वृध्दश्रमाची वाट दाखवतात. म्हणजे काय तर मुलगा असूनही एका अर्थाने ते निपुत्रीकच होतात. शंभर मुलांना जन्म देणारी महाभारतातील गांधारी आणि आधुनिक युगातील मुलाकडून वृध्दश्रमात ढकलली जाणारी स्त्री दोघींचेही दु:ख तेच आहे.
आपण म्हणतो काळ बदललाय. पण काळ बदलला म्हणून वृत्ती बदलली का हा खरा प्रश्न आहे. महाभारत हजारो वर्षांपूर्वी घडले पण त्यातील पात्रे नव्या रुपात येथे जन्म घेताना दिसतात. दुर्योधन दुषासन नव्य रुपात येथे जन्म घेताना दिसतात. तेथे द्रौपदीचे मदतीला श्रीकृष्ण धाऊन आला होता. या कलीयुगात अशा श्रीकृष्णाची वाट पाहणे धोक्याचे होईल. गांधारी प्रमाणे डोळे मिटून शांत राहू नका तर डोळे उघडे ठेवून वाटचाल करा. गांधारी प्रमाणेच महाभारतातील भिष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य अशा दिग्गजांनी डोळ्यांवर राजनिष्ठ रहण्याची पट्टी बांधली होती. व त्यामुळेच पुढे महाभारतातील भिषण युद्ध व नरसंहार झाला.
रामायण महाभारत हे आपले महान ग्रंथ आहेतच. पण आपण त्याकडे गांधारी बनून आंधळेपणाने न पहाता डोळसपणे पाहायला शिकले पाहिजे. महाभारतातील प्रत्येक पात्र आपल्याला शिकवण देत असते आपण फक्त डोळे उघडे ठेवून ती शिकवण अंगीकृत करणे हे महत्त्वाचे असते. गांधारीचा विचार त्या दृष्टीकोनातून करुन विषेषत: स्त्रीयांनी डोळ्यांवर पट्टी न बांधता डोळसपणे आपल्या आयुष्याकडे पहावे कोणताही निर्णय भावनिक दृष्टीने न घेता डोळसपणे घेणे ही आजच्या काळाची गरज आहे असे म्हणणे अधिक योग्य होईल.
सुरेश काळे
हो.९८६०३०७७५२
सातारा.
No comments:
Post a Comment